भुसावळ – अवघ्या १९ किलोमीटरच्या अंतर असूनही नशिराबाद व फेकरी या दोन ठिकाणी टोल घेतला जात असल्याने वाहनधारकांना मोठा भूर्दंड सोसावा लागत होता.

चिखली ते तरसोद महामार्गाचे चौपदरीकरण एकाच मार्गावर असतानाही सुरू असलेली लूट थांबवण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात असतानाच आता वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेकरीचा टोलनाक्याची मुदत संपत असल्याने ३ आक्टोंबरपासून हा टोल बंद करण्याचे आदेश काढल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.चिखली ते तरसोददरम्यान महामार्ग प्राधिकरणाने चौपदरीकरणाचे काम केले. मात्र १९ किलोमिटरच्या अंतरात वाहनधारकांना दोन ठिकाणी टोल भरावा लागत होता. दिव्य मराठीने हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. फेकरी टोल नाक्याजवळ महामार्गावरच मोठमोठ्या खड्यातून वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. महामार्गावर दुहेरी वाहतूकीसाठी फेकरी उड्डाणपूल आहे तर दुसरी बाजूचा दुहेरी पुलाचे काम अद्यापही पुर्ण झालेले नाही, असे असतानाही टोलधाड सुरुच होती. वरणगाव, मुक्ताईनगर भागातून जळगावला जाणाऱ्या वाहनधारकांना फेकरी व नशिराबाद असे दोन टोल भरावे लागत होते. मात्र आता ३ ऑक्टोंबरपासून फेकरी टोल बंद होणार आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळेल.गेल्या वर्षभरापासून फेकरी टोल नाक्याच्या हद्दीतील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता तयार करण्याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. खड्डे असतानादेखील वाहन धारकांना टोल भरावा लागत आहे.
आता हा टोल बंद झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच रखडलेल्या फेकरी उड्डानपूलाचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. फेकरी टोलनाक्याची मुदत संपल्याने हा टोलनाका ३ ऑक्टोंबरपासून बंद केला जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश प्राप्त झाले आहेत. उड्डानपूलाचे रखडलेले कामही आता गती घेत आहे. लवकरच चौपदरी उड्डानपूल तयार होईल. होईल, असे महमार्ग प्राधिकरणाचे , चंद्रकांत सिन्हा म्हणाले.


