भुसावळ (प्रतिनिधी )-
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून भविष्यातील तंत्रज्ञानात खूप मोठे अमुलाग्र बदल घडवून आणेल असे भाकीत सखोल अभ्यास आणि विश्लेषणांनीशी वर्तवले होते आणि आज जवळपास सहा दशकांनंतर ते खरे ठरते आहे असे मत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एआय डे साजरा करण्यासाठी तयार केलेल्या माहितीपत्रकाचे ऑनलाईन अनावरण करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी मांडले.
भविष्यातील ह्या उदयोन्मुख क्षेत्राची मूळ खोलवर रूजली जावी ह्या साठी, महाराष्ट्र राज्यात तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत, नासकॉम आणि आयटीएस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 जानेवारी 2021 हा दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता दिवस अर्थात आर्टिफिशियाल इंटेलिजन्स डे (एआय डे) म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. ह्या दरम्यान ह्या तंत्रज्ञानाच्या नवीन शाखेची भविष्यातील गरज आणि उपलब्धी ओळखून ह्या तंत्रज्ञाच्या महितीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाची आणि शिबिराच्या माहिती पत्रकाचे अनावरण श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.सुधीर ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ. गिरीष कुळकर्णी, डॉ. दिनेश पाटील, प्रा.अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स यांच्या संयोजनामुळे अशा प्रणाली विकसित होऊ शकतात ज्यामुळे मानवी जीवन अधिक सुलभ होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आजकाल आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात एआय तंत्रज्ञान वापरत आहोत हे देखील आपल्याला ठाऊक नसते. गुगल आपल्याला त्याच गोष्टींचे अचूक परिणाम दर्शविते ज्यासाठी आपण शोध घेतला किंवा फेसबुक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या आवडीचे फीड दर्शविते. गुगल असिस्टंट, अॅपलची सिरी आणि अॅमेझॉनची अॅलेक्सा ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रामची काही अचूक उदाहरणे आहेत जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत आहोत असे डॉ. राहुल बारजिभे यांनी सांगितले.
वल्ड ईकोनाॅमीक फोरमनुसार “2022 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता 58 दशलक्ष नवीन रोजगार निर्माण करू शकेल.” भारतासारख्या विशाल लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञ निर्माण झाले तर नोकारी आणि व्यवसायाचा मोठा प्रश्न सुटू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, रोबोटिक्स आणि सांख्यिकी क्षेत्राचा अद्भुत मिललाफ असणारे हे क्षेत्र आता भारतात सुद्धा रुजू होऊ पाहते आहे असे डॉ.गिरीष कुळकर्णी म्हणाले.



