भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता म्हणून अरुण कुमार तिवारी यांनी १ सप्टेंबर रोजी
पदभार स्वीकारला. याआधी ते मध्य रेल्वेतच मुख्य विद्युत अभियंता होते.
श्री तिवारी हे १९८६ च्या परीक्षेच्या बॅचचे भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिक सेवा (आयआरएसईई) अधिकारी आहेत. त्यांना मध्य रेल्वेवरील मुख्य विद्युत वितरण अभियंता, मुख्य विद्युत लोको अभियंता यांच्यासह भारतीय रेल्वेच्या विविध पदांवर काम करण्याचा विपुल आणि समृद्ध अनुभव आहे. १९८८ मध्ये भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेवर विविध क्षमतांमध्ये काम केले. त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मध्ये प्रतिनियुक्तीवरसुद्धा काम केले आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) बरोबरही त्यांचे निकटचे संबंध आहेत.
श्री. तिवारी यांना ट्रॅक्शन वितरण, इलेक्ट्रिक लोको मेंटेनन्स आणि ऑपरेशनचा विस्तृत अनुभव आहे आणि त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई उपनगरी नेटवर्कवरील डीसी-एसी रूपांतरणात महत्वाची भूमिका बजावली आहे, जो एमयूटीपी फेज पहिला आणि दुसरा (Phase I & II) अंतर्गत जागतिक बँकेच्या अनुदानीत प्रकल्पांपैकी एक होता. मध्य रेल्वेतील मुंबई उपनगरीय भागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल विभागातील डीसी-एसी रूपांतरणासाठी जबाबदार असलेल्या प्रकल्पात मुख्य प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आणि २०१६ मध्ये ते यशस्वीरित्या पूर्ण केले.
एस.पी. वावरे यांच्या निवृत्तीपश्चात श्री तिवारी यांनी प्रधान मुख्य विद्युत अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.



