महावितरणच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना फटका; विजेच्या कमी-अधिक दाबामुळे लाखोंचे नुकसान

भुसावळ – येथील श्रीनगर भागात १ जून पासून विजेच्या कमी अधिक दाबामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. वाऱ्याने पान जरी हालले तरी वीज गुल होत आहे. याबाबत कार्यालायाकडे सातत्याने नागरिकांनी पाठपुरावा केला तरीही मुजोर प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. सर्वात आधी तक्रार करणाऱ्याची तक्रार प्राधान्याने सोडवणे अपेक्षित होते. परिणामी श्रीनगर परिसरतील १२ ग्राहकांच्या घरातील अनेक उपकरणे जळाल्याने निकामी झाली. अचानक अधिक दाबाने विद्युत प्रवाहामूळे एका क्षणात लाखो रुपयांचे ग्राहकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरातील बल्ब, ट्युब, फ्रिज, मिक्सर, टीव्ही, पंखे, एलईडी लाईट जळाले आहेत. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी लावलेले वीज मीटर सुद्धा जळाले असल्याने महावितरणच्या वीज मीटरच्या मौलिकतेवरच शंका उपस्थित झाली आहे. पैसे देऊन फांद्यांची छाटणी करून घ्यावी असे सुचवले होते. मॉन्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांचे कॉन्ट्रॅक्ट दिल्यावरही पैसे देऊन काम करून घेण्याची वेळ श्रीनगरवासियांवर आली आहे. वेळीच उपाययोजना केली असती तर ही दुर्घटना टळली असती अश्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. मोठी रक्कम दिलेल्या ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. गणेश पाटील, प्रकाश जावळे, रावसाहेब माळी, विवेक लोखंडे, सुमन कोलते, रोहन सपकाळे, लोटन चौधरी या नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे महावितरणच्या या गलथान कारभाराची तक्रार केली आहे.

निष्क्रिय अधिकारी आणि मुजोर खाजगी गुत्तेदारी
सर्वसामान्य माणसांच्या जीवावर उठलेल्या महावितरण कार्यालयात सध्या सावळा गोंधळ सुरु आहे. शेकडो समस्यांनी मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांना शुल्लक कामासाठीही शेकडो चकरा माराव्या लागतात या कार्यालयात काम करणारे अनेक कर्मचारी दुसऱ्याच्या नावाने राजरोजसपणे आपली खाजगी ठेकेदारी जोरात चालवतात. त्यामुळे योग्य ते प्रमाणात महावितरणची कामे होताना दिसत नाहीत.

नुकसानभरपाईची मागणी
ऑक्टोबर २०२१ मध्ये अश्याच प्रकारे याच भागातील ग्राहकांचे नुकसान झालेले होते. त्याचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. महावितरणच्या गलथान कारभारामुळे दरवर्षी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एवढे घडून देखील महावितरण प्रशासनला अजूनही जाग आली नाही. पंचनाम्याच्या नावाखाली ग्राहकांचा वेळ वाया घालवण्यात महावितरणचे अधिकारी तरबेज असतात. यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून पंचनामे करावेत व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.