भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून कोरोना बाधीत रुग्णाचे संख्येत झपाट्याने वाढ होत आहे यामुळे मृतांच्या संख्येत सुद्धा वाढ होत आहे .ओघाने येथील स्मशानभुमीत मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी जागेचा चांगलाच अभाव जाणवू लागला आहे मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी जागा कमी पडत असल्याने अनेक मृतदेह हे तापी तीरी मिळेल त्या जागेवर जाळावे लागत आहेत.
महाराष्ट्रासह जळगाव जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रभाव व वाढती मृतांची संख्या पाहता भुसावळ तालुका परिसरातील यावल, रावेर, मुक्ताइनगर, बोदवड, जामनेर, इतरत्र ठिकाणातील जे रुग्ण भुसावळच्या खाजगी रुग्णालयात अथवा गोदावरी रुग्णालयाच्या कोविड विभागात उपचार घेतांना काही रुग्ण मृत होत आहेत त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी न पाठवता त्यांच्यावर भुसावळच्याच स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत.
परिणामी या स्मशानभुमी वर ताण पडला असुन पुरेसे ओटे नसल्याने मिळेल त्या जागेवर मृतदेहांचा अंत्यविधी केला जात असल्याचे धक्कादायक दृश्य पहावयास मिळत आहे.
असे अनेक मृतदेह आहेत ज्यांचे नातेवाईक नाहीत काहींचे असुनही ते येत नाही अशांचे मृतदेहांना भुसावळ येथिल मसीहा साईं भक्त नगरसेवक पिंटु कोठारी हे माणुसकी जपत अंत्यसंस्काराचे सोपस्कार करीत आहेत.कधी कधी तर स्वत: अग्निडागही देवून मानवतेचे दर्शन घडवीत आहेत. कोठारी हे स्वत: रुग्णवाहिके पासुन ते अत्याविधिस लागणारे लाकडे, डीझेल व अन्य सर्व खर्च स्वतः पदरमोड करून गेल्या वर्षभरापासून सातत्याने करीत आहे.



