भुसावळ( प्रतिनिधी ) तापी नदीच्या वरील भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. यामुळे तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
जिल्ह्यात जोरदार पाऊस नसला तरी तापी नदीचा उगमस्थान व हतनूर धरणाच्या वरील भागात अतिशय जोरदार वृष्टी सुरू आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. या अनुषंगाने शनिवारी सायंकाळी ३६ दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग सुरू आहे. तापी-पूर्णा नदीला पूर आल्याने प्रशासनाने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात तसेच हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. बर्हाणपूर, देडतलाई, टेक्सा, येरडी, गोपाळखेडा, चिखलदरा, लखपुरी, लोहारा आदी ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने धरणातून प्रती सेकंद १ लाख १६ हजार १३२ क्युसेस वेगाने विसर्ग सुरू आहे. यामुळे काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.



