मुंबई –
विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणा अत्यंत महत्त्वाचा घटक असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चालू वर्षाची शैक्षणिक घडी विस्कळीत झाली असून ती सुरळीत करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे .राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची माहिती एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या हेतूनं अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
‘कोरोना संकटाच्या काळात आपण १५ जूनपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग आपण सुरू केले आहेत,’ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये, त्यांनी कोणतंही दडपण घेऊ नये यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे,



