भुसावळ (प्रतिनिधी )
जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला असून कोरोनाने बरे होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.तसेच भुसावळ शहरातील लाॕकडाऊन वाढणार नसून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जळगांव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या दालनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार १३ जुलै रोजी आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भुसावळ शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यावर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली. लाॕकडाऊन असल्यामुळे कोरोना संशयीत रूग्णांचा शोध घेऊन त्यांचे तात्काळ स्वॕब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे, तसेच कोरोनाबाधीतांचे अहवाल सुद्धा तात्काळ उपलब्ध होत असल्याने त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.अहवाल लवकर प्राप्त होत असल्यामुळे रूग्णांवर उपचार करणे सोपे होत आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना बरे करून घरी कसे पाठवता येईल आणि रुग्णांची संख्या शून्यावर कशी आणता येईल यासंबंधी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.तसेच जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला असून कोरोनाने बरे होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.
लाॕकडाऊन वाढणार नाही –
तसेच भुसावळ शहरातील लाॕकडाऊन वाढणार नसून नियमां प्रमाणे अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी मास्क लावून व सोशल डिस्टनसिंग आदीं नियमांचे पालन करून दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले आहेत.
दरम्यान नुकत्याच सुरु झालेल्या ट्रामा केअर सेंटरला देखील जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करून सूचना दिल्या.
या बैठकीला आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने ,तहसीलदार दीपक देवरे व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



