भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करत रेल्वेच्या हायड्रॉलिक (जलनिस्सारण) व वॉटरवे पुलांचा रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी अथवा रस्ता म्हणून वापर तात्काळ बंद करण्याचे आवाहन केले आहे. अनेक ठिकाणी पादचारी, दुचाकीस्वार, ट्रॅक्टर तसेच बैलगाड्यांद्वारे या अरुंद पुलांचा अनधिकृत वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सूचना जारी केली आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे पूल केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी (जलनिस्सारणासाठी) बांधण्यात आले असून ते कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी किंवा रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी अधिकृत मार्ग नाहीत. अशा प्रकारचा वापर अत्यंत धोकादायक असून मानवी जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याची पातळी अचानक वाढल्यास वाहून जाणे, बुडणे किंवा जीवघेणे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. भुसावळ विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील १५६ हायड्रॉलिक पुलांची ओळख पटविली असून, या ठिकाणी अनधिकृतरीत्या रेल्वे मार्ग ओलांडण्याचे प्रकार आढळून आले आहेत. जिल्हानिहाय पाहता जळगावमध्ये ७१, नाशिकमध्ये ५३, बुलढाण्यात १७, खंडव्यात ११ तसेच अकोला आणि अमरावती येथे प्रत्येकी २ संवेदनशील ठिकाणे आढळली आहेत. भ्रामक वृत्तांबाबत रेल्वेचे स्पष्टीकरण रेल्वेच्या हायड्रॉलिक व जलनिस्सारण पुलांच्या वापराबाबत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीविरुद्ध व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. हे पूल कोणत्याही परिस्थितीत अधिकृत रस्ते नसून केवळ जलनिस्सारणासाठीच बांधण्यात आले आहेत. नागरिकांनी केवळ रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे कायद्यानुसार होणार कडक कारवाई रेल्वे अधिनियम, १९८९ च्या कलम १४७ नुसार रेल्वे रुळ, बोगदे, हायड्रॉलिक व जलनिस्सारण पुलांवर अनधिकृत प्रवेश करणे हा दंडनीय गुन्हा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सहा महिन्यांपर्यंत कारावास, ₹१,००० पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा व कायदा अंमलबजावणी पथकांकडून संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविण्यात आली असून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाला सहकार्याचे आवाहन जनतेचे जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सर्व संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी इशारा फलक बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच जळगाव, नाशिक, बुलढाणा, अकोला, धुळे आणि खंडवा जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस व ग्रामपंचायतींनी रेल्वे हद्दीतील अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करणे, जनजागृती मोहीम राबविणे आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांनी रोड ओव्हर ब्रिज (ROB), रोड अंडर ब्रिज (RUB), लेव्हल क्रॉसिंग आणि फूट ओव्हर ब्रिज (FOB) यांसारख्या अधिकृत मार्गांचाच वापर करावा. "काही मिनिटे वाचविण्यासाठी आपल्या जीवाशी खेळू नका; सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे," असा संदेश मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नागरिकांना दिला आहे.


