देशात लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय : म्हणाले…!

नवी दिल्ली : देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला. कोरोनाचा उद्रेक वाढला असलातरी देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं. आवश्यक असलेल्या औषधांच्या बाबतीत केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे, सर्व राज्यांकडे लसीचे डोस उपलब्ध आहेत असंही पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्रातून दोन मंत्री बैठकीत सहभागी
ओमायक्रॉनचा संसर्ग आणि कोरोनाचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीत भाग घेतला.