वरणगाव – राज्यपरिवहन महामंडळाच्या बस चालकांच्या संपाचा फटका सर्वसाधारण प्रवाशांप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही बसत असुन त्यांना तीन ते चार किलोमिटर अंतर पायी चालत लसीकरणासाठी वरणगावातील शाळा गाठावी लागत आहे. यामुळे पालकवर्गात तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने शासनाच्या माध्यमातुन यावर नियत्रंणासाठी लसीकरणावर भर दिला आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश असुन शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले. यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लसीकरणासाठी शाळांमध्ये धाव घेतली.
मात्र, परिवहन महामंडळाच्या बसेसच्या संपामुळे खासगी प्रवाशी वाहतुक करणार्या वाहनधारकांनी प्रवाशी भाड्यात कमालीची वाढ केली आहे. यामुळे ग्रामिण भागातील तळवेल व परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थींनींना हा खर्च परवडणारा नसल्याने त्यांना पायपीट करीत वरणगावातील शाळा गाठावी लागते.
तसेच शाळेनंतर पायपीट करूनच घरी जावे लागत आहे. यामूळे पालकवर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पालक व विद्यार्थी वर्गाला तुर्त दिलासा मिळाला आहे.
आदेशाचे होतेय उल्लंघन
शासनाने नागरीकांनी काही सुचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे नमुद केले आहे. मात्र, या आदेशाचे कुठेच पालन होतांना दिसुन येत नाही. तसेच बसमध्ये 50 टक्के क्षमतेने प्रवास करण्याची सुचना दिली आहे. प्रत्यक्षात मात्र, परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने बसेसची चाके आगारातच रुतुन पडली आहे.
यामुळे प्रवाशांना खासगी प्रवाशी वाहतूक करणार्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी बसवुन वाहतूक होत असल्याने कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्यास पोषक वातावरण निर्माण होत आहे. मात्र, या प्रकाराकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


