भुसावळ – मध्य रेल्वेने १ जानेवारी २०२२ रोजी किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्या पूर्ण केल्या.
दि. १ जानेवारी २०२२ रोजी, मध्य रेल्वेने सावदा ते आदर्श नगर दिल्ली किसान रेल्वेची ९००वी फेरी केली. मध्य रेल्वेवर ९०० फेऱ्या पूर्ण करणारी किसान रेल हा शेतकऱ्यांची समृद्धी करणारी सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा बदल करणारा उपक्रम ठरला आहे.

जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५०% अनुदानासह, कृषी उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून, किसान रेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धी, आनंद आणि आशा निर्माण केली आहे. पहिली किसान रेल सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्यांमधून ३,१०,४०० टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे.
दि. ७.८.२०२० रोजी पहिली किसान रेल आणि दि. २८.१२.२०२० रोजी किसान रेलची १००वी ट्रिप चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता ज्याला माननीय पंतप्रधानांनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. किसान रेलची ५००वी ट्रिप दि. १२.८.२०२१ रोजी चालली. आता, किसान रेल्वेची ९००वी ट्रिप १ जानेवारी २०२२ रोजी सावदा येथून आदर्श नगर, दिल्ली येथून निघाली.
सोलापूर विभागातील डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिरची, कस्तुरी खरबूज, पेरू, सीताफळ, बेर (भारतीय मनुका), लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, नाशिक विभागातील कांदे, भुसावळ आणि जळगाव विभागातील केळी, नागपूर विभागातील संत्री आणि इतर फळे व भाजीपाला किसान रेलच्या माध्यमातून दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल सारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये त्वरीत पोहोचतात. मोठ्या बाजारपेठांसह चांगला महसूल तसेच त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत, जलद वाहतूक, कमीत कमी वाया जाणे या कारणांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. किसान रेल हे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी विकास आणि समृद्धीचे इंजिन बनले आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन – टॉप टू टोटल’ या सरकारच्या व्हिजनचा एक भाग म्हणून सरकारने शेतकऱ्यांना ५०% अनुदान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वे ही पहिली पसंती ठरली आहे.
श्री अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले की, किसान रेलच्या ९०० फेऱ्या या जलद आणि सुरक्षित वाहतूक तसेच नवीन मोठ्या बाजारपेठांमधील प्रवेशासह शेतकर्यांना त्याचे प्रचंड फायदे अधोरेखीत करतात.
मध्य रेल्वे सध्या देवळाली -मुझफ्फरपूर, सांगोला -मुझफ्फरपूर, सांगोला -आदर्श नगर दिल्ली, सांगोला -शालीमार, रावेर -आदर्श नगर दिल्ली आणि सावदा -आदर्श नगर दिल्ली या ६ किसान रेल चालवित आहे.


