एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे : अजय गुजर यांची घोषणा मात्र कर्मचाऱ्यांना निर्णय अमान्य :


मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजय गुजर यांनी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र गुजर यांचा निर्णय अमान्य करत एसटी कर्मचाऱ्यांनी दुखवटा चालूच ठेवला आहे. यापूर्वी 28 युनियनने संपातून माघार घेतली तरी दुखवट्याला काहीही फरक पडला नाही, ही 29 वी युनियन आहे, या युनियनमध्ये माणसे नाहीत, अशी प्रतिक्रिया यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

संपात फूट; अजयकुमार गुजर प्रणित संघटनेची माघार
मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात (ST Workers Strike) फूट पडली आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर (Ajaykumar Gujar) यांच्या संघटनेने आज संपातून आज माघार घेतली आहे. गुजर यांनी कामगारांना (ST Workers) कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. गुजर यांची आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासोबत मंत्रालयात साधारण पाच तास चर्चा झाली. या चर्चेनंतर गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अजय गुजर म्हणाले की, एसटी संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. विलीनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो सरकार आणि कर्मचारी आम्हाला मान्य असेल. आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळावी, करोना काळात 306 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांना शासन निर्णयाप्रमाणे 50 लाख रुपये देण्यात यावे व आतापर्यंत 10 जणांना ही मदत देण्यात आली आहे. उर्वरीत कामगारांच्या कुटुंबांना लवकरच हा निधी दिला जाईल. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी विलीनीकरणाबाबत आहे. न्यायालयाने आमच्या विरोधात जरी निर्णय दिला तरी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपासून रात्री 12 वाजेपासून कामावर रुजू व्हावे. एसटी संपाची नोटीस आम्ही दिली होती त्यामुळे आमची संघटना संप मागे घेत आहे, अशी घोषणा अजय गुजर यांनी केली आज केली.

काही गोष्टी मान्य केल्या ; अनिल परब
अनिल परब म्हणाले की, आमच्याकडून वारंवार चर्चेचं आवाहन केले गेले. चर्चेला प्रतिसाद देत एसटी कर्मचारी संघटनेचे अजयकुमार गुजर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली. आम्ही काही गोष्टी मान्य केल्या आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा त्रिसदस्यीय समितीसमोर आहे. त्या समितीचा जो निर्णय असेल तो आम्हाला आणि कर्मचाऱ्यांना मान्य असेल. आर्थिक मागण्यांबाबत शासकीय कर्मचाऱ्यांसारखं वेतन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. आम्ही मूळ पगारात वाढ केली आहे. पण त्या विषयावर आम्ही चर्चेस तयार असल्याचे मान्य केले आहे. कामगार कामावर रुजू झाले, डेपो सुरु झाले तर निलंबन किंवा बडतर्फ करण्याची कारवाई मागे घेतली जाईल. केवळ ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची संबंधित प्रकिया पूर्ण करुन कारवाई मागे घेतली जाईल, असे परब म्हणाले.

गुजर हे शरद पवारांच्या राजकारणाला बळी पडले
हा कष्टकऱ्यांचा दुखवटा आहे त्यामुळे यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वासही सदावर्ते यांनीही व्यक्त केला. शरद पवारांचे राजकारण या ठिकाणी येईल हे आधीच वाटले होरे. गुजर हे शरद पवारांच्या याच राजकारणाला बळी पडले असतील, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. हा संघटनेच्या बळावर दुखवटा सुरू नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या बळावर हा दुखवटा सुरू आहे, कृपा करून कष्टकऱ्यांना वाईट वाटेल असे, बोलू नये, असे आवाहनही सदावर्तेंनी केले आहे.