भुसावळात ‘विघ्नहर्त्या’चे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात आगमन , शहर-तालुक्यात २७० सार्वजनिक मंडळांत श्रींची स्थापना;

 सुमारे २९ हजार घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना; पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भुसावळ (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) भुसावळ शहरासह संपूर्ण तालुक्यात लाडक्या गणरायाचे भक्तिभाव आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच गणेशमूर्तींच्या आगमनासाठी रस्त्यांवर भाविकांची लगबग सुरू होती. ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि फुलांची उधळण अशा भक्तिमय वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाचे ठिकठिकाणी जल्लोषात आगमन झाले. घराघरांत तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये विधिवत पूजन व प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने संपूर्ण भुसावळ तालुका गणेशमय झाला.

२७० सार्वजनिक मंडळांत श्रींची स्थापना

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहर आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. यंदा भुसावळ तालुक्यात तब्बल २७० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली असून, सुमारे २९ हजार घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शहरातील गल्ली-बोळांपासून ग्रामीण भागातील गावागावांत भक्ती, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

बाजारपेठेत चैतन्य; पूजासाहित्याच्या खरेदीसाठी गर्दी

गणेश चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच भुसावळच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गणेशमूर्ती, पूजा साहित्य, फुले, पत्री, मखर, सजावटीचे साहित्य तसेच मोदक आणि विविध मिठाई खरेदीसाठी भाविकांची लगबग सुरू होती. शुभमुहूर्तावर घरगुती गणपतींचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

शहरात १८५ सार्वजनिक गणेश मंडळे

भुसावळ शहरात यंदा एकूण १८५ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. यामध्ये बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११६, तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६९ मंडळांचा समावेश आहे.

मातृभूमी मंडळाचा ‘खान्देशचा राजा’, ‘श्रीराम नगरचा राजा’, ‘भुसावळकरांचा चिंतामणी’, तसेच जय गणेश फाउंडेशनचा ‘नवसाचा गणपती’ यांसह विविध मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि सामाजिक व धार्मिक संदेश देणाऱ्या विविध देखाव्यांची तयारी केली आहे. अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला मंडपात आणून त्यांचे स्वागत केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यावर अनेक मंडळांनी भर दिला आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्ती, नैसर्गिक रंग तसेच पर्यावरणस्नेही सजावटीच्या साहित्याचा वापर करण्याकडे भाविकांचा कल दिसून आला. काही मंडळांनी प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केला असून, जनजागृतीपर फलक आणि संदेशांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा जागर करण्यात येत आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरासह तालुक्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळे, प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच संभाव्य मिरवणूक मार्गांवर पोलिस कर्मचारी आणि होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

गणेश चतुर्थीच्या प्रारंभापासूनच भुसावळ शहरासह तालुक्यात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पुढील दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह आणखी द्विगुणित होणार आहे.