भुसावळात पं. प्रदीप मिश्रा दाखल; आजपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात


भुसावळ (प्रतिनिधी ): भुसावळजवळील अकलूद शिवारात आजपासून कथावाचक पं. प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील तापी नगर परिसरातून तापी नदी पर्यंत आणि तेथून कथास्थळापर्यंत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.

कथेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भुसावळ मार्गे रावेरहून मध्यप्रदेशकडे आणि भुसावळहून यावलमार्गे गुजरातकडे जाणारी तसेच येणारी सर्व अवजड वाहतूक पुढील सात दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

कथास्थळी भव्य व्यवस्था

भाविकांसाठी कथास्थळी मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारण्यात आल्या आहेत. १३२ बाय ६०० फूट आकाराचा एक तसेच १०० बाय ६०० फूट आकाराचे तीन जर्मन हँगर डोम उभारण्यात आले आहेत. मुख्य व्यासपीठ ४० बाय ८० फूट आकाराचे आहे.

भाविकांच्या आसन व्यवस्थेसाठी सुमारे १५०० सिलिंग मंडप उभारण्यात आले असून भोजन व्यवस्थेसाठी ३८० सिलिंग मंडप तयार करण्यात आले आहेत. दररोज किमान एक लाख भाविकांना प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपांमध्ये प्रकाशासाठी मोठ्या दिव्यांची सोय करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली. सायंकाळपर्यंत सहा हजारांहून अधिक भाविक कथास्थळी दाखल झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

हेलिकॉप्टरचा कार्यक्रम रद्द

पं. प्रदीप मिश्रा हे सुरुवातीला ललितपूर – झांसी येथून रस्तेमार्गे येणार असल्याची माहिती होती. नंतर ते हेलिकॉप्टरने येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे तात्पुरते हेलिपॅड तयार करण्यात आले होते.

दुपारी २ वाजता त्यांचे आगमन अपेक्षित असल्याने भाविकांनी दुपारी १२ पासून मैदानावर गर्दी केली होती. मात्र दुपारी ४ वाजता हेलिकॉप्टरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि पुन्हा रस्तेमार्गे येण्याचे ठरले. अखेर पं. प्रदीप मिश्रा रात्री ९ वाजता भुसावळात दाखल झाले.

पोलिसांचा बंदोबस्त

अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी कथास्थळी बंदोबस्ताची पाहणी केली. रस्ते, पार्किंग व अन्य ठिकाणी नेमलेल्या पोलिसांनी आपल्या नियुक्त ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. नियुक्त ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित आढळल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रशासनावर टीका

आयोजन समितीने भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. कथास्थळी केवळ भुसावळ नगरपालिका यांची फिरती टॉयलेट व्हॅन उपलब्ध झाली असून इतर नगरपालिकांकडून अपेक्षित सुविधा मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

सोमवारीच सहा हजारांहून अधिक भाविक मंडपात दाखल झाल्याने काहींना पिण्याच्या पाण्याची अडचण भासल्याची तक्रार करण्यात आली.

वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग

कथा सुरू होण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर भुसावळ–फैजपूर व यावल मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तापी नदी वाय पॉईंटवर तात्पुरते बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वाहतूक सुरळीत राहील. कथा सुरू झाल्यानंतर रस्त्यावर गर्दी कमी असल्यास परिस्थितीनुसार वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.