विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांना द्यावी लागेल गुन्ह्यांची माहिती -खाडाखोड टाळण्याची सूचना : भुसावळात प्रांताधिकारी कार्यालयात बैठक

भुसावळ – विधानसभा निवडणुकीत उभे राहणार्‍या उमेदवारांनी उमेदवारी अर्जात सर्व माहिती भरावी, प्रतिज्ञा पत्रात सर्व सविस्तर माहिती द्यावी, गुन्हे काय दाखल झाले आहे, त्याची सविस्तर नोंद करावी, प्रतिज्ञापत्रात भरलेली माहिती वृत्तपत्रातून सुध्दा प्रसिध्द करावी, उमेदवारी अर्ज भरतांना आडवी रेष मारू नये, तेथे हो-नाही काही -तरी लिहावे, अश्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिल्यात. राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याच्या आयोजीत बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी चार वाजता निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन केले.

मतदान केंद्र आवारात वाहनांना बंदी
प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले की, मतदान केंद्रात एकावेळी दोन महिला व एक पुरूष मतदानासाइी सोडण्यात येतो मात्र एक-एक करीत त्यांनी मतदान करायचे आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरात कुठलेही वाहन नेता येणार नाही. वयोवृध्द मतदारांना मदत करण्यासाठी ओटर पथक सज्ज राहणार आहे. जर एखाद्या वयोवृध्द मतदारासोबत घरातील 18 वर्षाच्या आतील सदस्याला जाता येणार आहे, त्यासाठी त्यांना निवडणूक यंत्रणेकडे 15 नंबरचा फॉर्म भरून द्यायचा आहे, तरच त्या मतदारासोबत बुथपर्यंत जाता येणार आहे. उमेदवारांनी दररोजचा खर्च लिहायचा आहे, सादर करायचा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना अर्ज परिपूर्ण भरलेला पाहिजे, सर्व संपत्ती, जंगम मालमत्ता यांची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार निता लबडे व नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी सुध्दा निवडणूकीच्या दृष्टीने सूचना केल्यात.

केवळ पाच जणांचा प्रवेश
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ पाच जणांनाच प्रवेश असेल. रॅली असल्यास मेनरोडवरच ती थांबवली जाणार आहे. तेथून उमेदवारसह समर्थकांना पायी यावे लागणार आहे. सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असेल, असेही प्रांताधिकारी म्हणाले.