भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणार्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणार्या तीन एके-47 रायफल्ससह दोन अत्याधूनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

कुलूप तोडून लांबवले शस्त्र
कनिष्ठ कार्यप्रबंधक प्रदीपकुमार बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार क्वालिटी कंट्रोल रूम (प्रुफ टेस्टींग विभाग) च्या शस्त्रागाराचे कुलूप 19 ते 21 ऑक्टोबरदरम्यान चोरट्यांनी तोडून त्यातील तीन लाख रुपये किंमतीच्या तीन एके 47 तसेच पाच लाख रुपये किंमतीच्या दोन गलील रायफल लांबवल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वरिष्ठांना तातडीने माहिती देण्यात आली. आयुध निर्माणी प्रशासनाच्या अधिकार्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र गहाळ झालेल्या पाच रायफली कुठेही न आढळल्याने पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.
चाचणीसाठी वापरण्यात येणार्या रायफल्स्
वरणगाव आयुध निर्माणीत देशाच्याा लष्करासाठी एके 47 रायफलच्या गोळ्या (काडतूस) तयार केल्या जातात. या गोळ्या तयार झाल्यानंतर सीमेवर पालवण्याआधी त्यांची निर्माणी परिसरातच एके 47 या रायफलद्वारे चाचणी घेतली जाते. या चाचणीसाठी वापरल्या जाणारे शस्त्रच चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली.
अधिकार्यांनी दिल्या भेटी
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक जनार्धन खंडेराव आदींनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.


