जळगाव : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल, 2022 या कालावधीत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात आली आहे. परीरक्षेच्या वेळी गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरुपी दक्षता समिती स्थापन केली आहे. या समिती व्यतिरीक्त प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी 18 फेब्रुवारी, 2022 अन्वये परीक्षा चालू असतांना केंद्रावर भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठे पथकाचा राहणार वॉच
दहावीच्या परीक्षेकरीता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा, महाविद्यालयात परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आलेले असल्यामुळे शाळा, महाविद्यालयात गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी शनिवार, 19 मार्च, 2022 रोजी जळगाव शहरातील 10 वी च्या परीक्षा केंद्रावर बैठे भरारी पथकाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.




