पाळधी गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी २५ कोटींची योजना मंजूर करणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील !पूल व रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन; विश्रामगृहासह दोन नवीन पुलांनाही मान्यता ;

धरणगाव / जळगांव –

चांगले रस्ते व पूल हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर जनतेच्या सोईसाठी देखील उपयुक्त आहेत. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती करत असताना आपण राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य दिले आहे. पाळधी गावासाठी गिरणा नदीवरून २५ कोटींची योजना मंजूर करणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जागेत शासनाच्या परवानगीने पाण्याची टाकी बांधणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी पाळधी बु. येथे २ कोटी ३८ लक्षच्या पुलाचे व रस्त्याच्या कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते. तर याचसोबत पाळधी गावासाठी दोन नवीन पुल व शासकीय विश्रामगृहांची कामे देखील मंजूर असून त्यासाठी 2 कोटी 43 लक्ष निधी मंजूर असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पाळधी येथे १ कोटी ४३ लक्ष निधीतून रेस्ट हाऊससाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून नाबार्ड – २५ मधून पाळधी गावाजवळील चांदसर रस्त्यावर तसेच पथराड रस्त्यावर लहान पुलासाठी १ कोटी निधी मंजूर आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. गावाचा विस्तार झपाट्याने होतअसून वाढीव वस्तीत पुढील काळात रस्त्यांचे खडीकरण करणार असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

१६ लाखाचे बौद्ध विहार

पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गावात भव्य असे बौद्धविहार व्हावे अशी मागणी करताच ना. पाटील यांनी १६ लक्ष निधी आमदार निधीतून देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे भीमसैनिकांची इच्छा पूर्ण होणार असून बौद्धविहाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार !

पाळधी पथराड झुरखेडा दहिदुल्लारस्ता प्रजिमा ५७ किमी ० /०० ते ०/७०० मशिदी पासून ते बस स्टॅन्ड पर्यंत अशी एकूण ७७० मीटर लांबी चे काम ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे, रस्त्याची सुधारणा करणे व पाळधी गावात लहान पुलाचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.

सदर कामास मार्च २०२० च्या अर्थसंकल्पानुसार रुपये ३ कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. सदर कामाची टेंडर किंमत २ कोटी ३८ लक्ष इतकी आहे. कोविड च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील कामे सुरू करता येऊ शकली नव्हती. सदर रस्त्याच्या व पुलाच्या कामामुळे पाळधी मधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न देखिल सुटणार आहे.

नवीन कामांचेही प्रस्ताव

दरम्यान, पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, आज करण्यात आलेल्या भुमिपुजनासोबत गावात अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. यातील लक्षणीय कामे म्हणजे पथराड आणि सोनवद या दोन गावांना जाणार्‍या रोडवर दोन स्वतंत्र पूल होणार आहेत. तर पाळधी येथे सुसज्ज शासकीय विश्रामगृहाला देखील मान्यता मिळाली असून एकूण यासाठी 2 कोटी 43 लक्ष निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, उपसभापती शारदाताई प्रेमराज पाटील, चांद सर सरपंच सचिन पवार, आसाराम कोळी, अनिल पाटील, ,पाळधी बु. सरपंच अलकाबाई प्रकाश पाटील, पाळधी खु. सरपंच सुनंदाबाई भगवान माळी, शरद कोळी,उद्योगपती शरद कासट, दिलीप पाटील माजी सरपंच सुनंदाबाई माळी, अनिल देशमुख , युवासेनेचे आबा माळी, सा. बा. विभागाचे उप अभियंता मुकेश ठाकूर , शाखा अभियंता व्ही. टी. महाजन , बी.एस. माळी , गोकुळ नाना पाटील, बबलू पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, व महिला आघाडीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकात पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी सदर रस्ते व पुलाबाबत सविस्तर माहिती दिली. आभार युवासेनेचे आबा माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *