भुसावळ (प्रतिनिधी )-
वाघूर धरणात बुडाल्याने जळगाव तालुक्यातील कंडारी येथील फिरोज लतीफ देशमुख वय २२ या युवकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे रविवारी हा युवक धरणात बुडाल्यानंतर मंगळवारी सकाळी पाण्यावर तरंगतांना त्याचा मृतदेह आढळल्याने पोलिसांनी तो ताब्यात घेतला.
रविवारी दुपारी १२ वाजता फिरोज हा मित्रांसोबत वाघूर धरणावर गेल्यानंतर पाण्यात मासे पकडण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. या नंतर मित्रांनी पोहणार्या युवकांना बोलावले मात्र फिरोज आढळला नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानेही शोध घेतला मात्र यश आले नाही. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिरोज याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आल्यानंतर हा मृतदेह बाहेर काढून जळगाव शासकीय मेडीकल कॉलेज तथा जिल्हा हॉस्पीटलमध्ये शवविच्छेदनासाठी तो हलवण्यात आला. सलीम दादामिया देशमुख (कंडारी, ता.जळगाव) यांच्या खबरीनुसार तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याप्रसंगी तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, युनूस शेख, विठ्ठल फुसे, राजेद्र पवार, राहुल महाजन आदी उपस्थित होते.



