भुसावळ (प्रतिनिधी )-
आधीच शहरवासियांवर कोरोनाचे सावट एकीकडे कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढ होत असतांना नागरीक आरोग्या काळजी घेत असतांनाच दुसरीकडे पालिका प्रशासनाकडून शहरात अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांनी या संदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांना निवेदन दिले असून आठ दिवसात पाण्याची समस्या निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नगरसेवक किरण कोलते यांच्या निवेदनानुसार, शहरातील देना नगर, सिद्धेश्वर नगर, कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, सुरभी नगर आदी भागात शौचाचा वास येत असलेले व फेस मिश्रीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जनता भयभीत असताना नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रताप पालिकेचा पाणीपुरवठा विभाग करीत असून बेजबाबदार अधिकार्यांच्या कार्याला जनता आता कंटाळली असून कोरोनाच्या विषाणपेक्षा पालिकेचे नळाला येणारे पाणी नागरीकांच्या मृत्यूला अधिक जवाबदार असल्याचा आरोपही कोलतेंनी केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हिरवे व शेवाळयुक्त पाण्यामुळे सकाळचा चहा नागरीकांनी प्यावा की नाही हादेखील प्रश्न आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरीकांना डायरीयाची लागण झाल्यास जवाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. आठ-दहा दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास भुसावळकर तीव्र आंदोलन छेडतील व त्यास पालिका पाणीपुरवठा अभियंता जवाबदार असतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे



