भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षेसंबंधी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. मिनाक्षी वायकोळे या होत्या तर तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून सहाय्यक राज्यकर आयुक्त समाधान महाजन व राज्यकरनिरीक्षक मा. डॉ. जितेंद्र बाविस्कर हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यशाळेच्या उद्घाटना नंतर सर्वप्रथम सहाय्यक राज्यकर आयुक्त
महाजन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्त्वाची अंतर प्रेरणा आहे. तसेच स्पर्धा परीक्षा असं क्षेत्र आहे की यातून समाजसेवा व समाजाचं आपण काही देणं लागतो ते देणे पूर्ण होतं विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. जेणेकरून आपण समाजाची तसेच राष्ट्राची सेवा करू शकतो आणि स्पर्धा परीक्षा देत असताना आपण या परीक्षांच्या अभ्यासासाठी महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरुवात करावी. अशी सुरुवात केल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करू शकतो व स्पर्धा परीक्षा पास होऊन एखाद्या चांगल्या पदावर विराजमान होऊन देशाची सेवा पर्यायाने समाजाची सेवा करू शकतो. मित्रांनो एक लक्षात ठेवा या जगात अशक्य असे काहीच नसते फक्त गरज असते ती जिद्दीची आणि आपण जिद्द कायम ठेवली तर कोणतीही परीक्षा ही यशस्वी होऊ शकतो असा ठाम आत्मविश्वास आपल्यामध्ये आपण निर्माण करावा असे मार्मिक व उदबोधन पर मार्गदर्शन त्यांनी केले.
दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करतांना डॉ. जितेंद्र बाविस्कर यांनी एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास करताना कसे नियोजन करावे व कसा अभ्यास करावा याविषयी मार्गदर्शन केले. आपण जर एमपीएससी परीक्षा पास करायची असेल तर आपण याकडेच लक्ष देऊन आपण खालच्या वर्गापासून एमपीएससी विषयी ही माहिती मिळवावी. एमपीएससी व युपीएससी मार्फत भरली जाणारी सर्व प्रकारची विविध पदे, परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेच्या वेळापत्रकासंबंधी सुसूत्र पणे माहिती सांगितली तसेच त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत व एमपीएससी तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील मुलभूत फरक समजावून सांगितला असे मार्मिक मार्गदर्शन केले. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. वायकोळे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच एमपीएससी यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांकडे आपले लक्ष केंद्रित करावे व एक विशिष्ट ध्येय मनाशी बाळगून त्या ध्येयाला झपाटून अभ्यास करावा. जेणेकरून आपल्या महाविद्यालयातून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल होतील आणि या त्यांच्या प्रशासकीय सेवेचा अनुभवाचा महाविद्यालय तसेच समाजाला फायदा घेता येईल. महाविद्यालयामध्ये दरवर्षी अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन यासंबंधी कार्यशाळांचे आयोजन केलं जातं म्हणून या स्पर्धा परीक्षा केंद्राचा मला सार्थ अभिमान आहे.असे अभिमानास्पद गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. आर. आर. पाटील तर सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी केले. यशस्वितेसाठी स्पर्धा परीक्षा समितीचे सदस्य प्रा. सौ. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. आर. एस.नाडेकर, प्रा. प्रफुल्ल इंगोले, प्रा. चंद्रकांत सरोदे यांनी परिश्रम घेतले.



