भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील चोरवड येथे एका बंद घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर ग्रामस्थांनी खातरजमा केल्यानंतर ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. आज दि.६ मार्च शुक्रवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुजय नारायण जावळे (वय ३०) हे मयत तरुणाचे नाव असून शक्ती फाऊंडेशनचे विजय जावळे यांचे ते बंधू होते. जावळे हे चोरवड गावात गेल्या काही वर्षांपासून एकटेच राहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.भुसावळ तालुका पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर सपोनि. अमोल पवार,पोहेकाॅ.अजय माळी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. याबाबत गणेश जावळे यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सरपंच प्रविण गुंजाळ,माजी सरपंच बाळू गोलांडे यांनीही मदतकार्य केले.



