भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील 21 वर्षीय तरुणाचा चाकूचे वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास खडका रोडवरील पुलाखाली घडली होती. या हल्ल्यात अल्तमश रशीद शेख (21, बाबला हॉटेलजवळ, जाम मोहल्ला, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शेख समीर शेख युसूफ (19), शेख शाहरूख शेख युसूफ (27, दोन्ही रा.रींग रोड, भुसावळ) व समीर शेख रहेमान शेख (18, पंधरा बंगला, भुसावळ) यांना सोमवारी पहाटे पाच वाजता सुंदर नगर परीसरातून अटक करण्यात आली.
खुनाच्या घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली तर आरोपी वरणगाव रोडवरील सुंदर नगराजवळून पळून जाण्याच्या बेतात असताना बाजारपेठ पोलिसांनी तिघांच्या सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या. शेख समीर शेख युसूफ (19), शेख शाहरूख शेख युसूफ (27, दोन्ही रा.रींग रोड, भुसावळ) व समीर शेख रहेमान शेख (18, पंधरा बंगला, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर अमीर युसूफ शेख, आदर्श गायकवाड हे आरोपी पसार असून त्यांचादेखील कसून शोध सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व मंगेश गोटला, नाईक रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, किशोर महाजन, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, श्रीकृष्ण देशमुख, गजानन वाघ आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.



