भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील वाढते तापमान,वृक्षांची होणारी कत्तल आणि नागरिकांकडून प्लास्टिक कॅरीबॅगचा होणारा अतिवापर यामुळे पर्यावरणाचा समतोल खालावत चालला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरात एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरी’चे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने ५ जून रोजी सकाळी ६:३० वाजता अष्टभुजा मंदिर समोर प्रभात फेरी मधील सर्व सदस्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
सध्याच्या काळात प्लास्टिक कचऱ्यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्याला पर्याय म्हणून प्रत्येकाने कापडी पिशवीचा वापर करणे काळाची गरज बनली आहे,तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आला.
याप्रसंगी ‘श्री राधाकृष्ण प्रभात फेरी’चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभात फेरीच्या या स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो ओळ – भुसावळ येथील अष्टभुजा मंदिरासमोर पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापराव्या असा संदेश देत कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे सदस्य.


