तब्बल अडीच वर्षांचा विलंबानंतर भुसावळ महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल उद्यापासून वाहतुकीसाठी होणार खुला ;

भुसावळ (प्रतिनिधी) : चिखली ते तरसोद दरम्यानच्या महामार्गाचे काम पूर्ण होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला गेला आहे. यानंतर आता उशिराने का होईना अखेर नशिराबादजवळील रेल्वे उड्डाणपुलाची एका बाजूचा नवनिर्माणाधीन रेल्वे उड्डानपूल 26 ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

कामात प्रचंड दिरंगाई
नशिराबाद टोल टॅक्सजवळ असलेल्या या रेल्वे उड्डाणपुलाचे भुसावळ-जळगाव मार्गावरील बांधकाम काही महिन्यांपासून रखडलेले होते. दरम्यानच्या या कामात दिरंगाई झाली मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काम गतीमान करून आता अंतिम टप्प्यात आणले आहे. महामार्ग सुरु झाल्यापासून म्हणजे अडीच वर्षांपासून हे काम अंत्यत संथगतीने सुरु होते. यामुळे जुना रेल्वे उड्डापनूल अर्थात एकाच बाजूच्या रस्त्यावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले असून नागरिक व वाहनचालकांकडून पुलाचे दुसरे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

वाहनधारकांना दिलासा
नशिराबाद परिसरातील नागरिकांसाठी हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून 26 ऑक्टोबरपासून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू झाल्याने प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने या रेल्वे उड्डानपुलाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. भुसावळ ते जळगाव या मार्गावरील वाहतूक हा पुल सुरु झाल्यानंतर रखडलेला हा पुल आता वाहतूकीसाठी खुला होणार असल्याने वाहनधारकांना दिलासा आहे.

लोड चाचणी केली जाईल
रेल्वे विभागाच्या आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून लोड टेस्ट केली जाणार आहे. या चाचण्या समाधानकारक झाल्यानंतर 26 ऑक्टोबरपासून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. यामुळे वाहनधारकांना चांगल्या दर्ज्याच्या सुविधा मिळतील, असे महामार्ग दुरुस्ती विभागाचे अभियंता रुपेश गायकवाड म्हणाले.