देशात वक्फ कायदा लागू झाला ; केंद्राने जारी केली अधिसूचना –

नवी दिल्ली – आजपासून संपूर्ण देशभरात वक्फ कायदा लागू झाला आहे. गत आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झालेले वक्फ सुधारणा विधेयक कायद्यात रुपांतरीत झाल्याने केंद्र सरकारकडून ते लागू करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात 15 हून अधिक वक्फ विधेयकाविरोधात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच केंद्र सरकारने हा कायदा लागू केला आहे.

अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने वक्फ कायदा लागू केल्याची अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकांवर सुनावणी होण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. यामध्ये आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश दिला जाऊ नये असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात धाव
आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान आणि द्रमुक यांनीही वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 ला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मणिपुरात हिंसाचार भडकला
नवीन वक्फ कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असगर अली मक्काम्युम यांच्या घराची रविवारी जमावाने तोडफोड केली आणि आग लावली.