बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मविआकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक –

मुंबई – : बदलापूरमधील एका शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

अकार्यक्षम सरकारला आता जनताच आरसा दाखवेल : नाना पटोले
महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकार्‍याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिली आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. या माध्यमातून अकार्यक्ष सरकारला आरसा दाखवण्याचे काम जनता करेल, असं नाना पटोले म्हणाले.

राजकीय हेतूने आंदोलन प्रेरीत : मुख्यमंत्र्यांचा आरेाप
मुख्यमंत्र्यांनी बदलापूरात काल झालेल्या आंदोलनाविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जे आंदोलन होते ते राजकारणाने प्रेरित होते कारण एवढ्या लवकर जेव्हा आंदोलन होते त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.