भुसावळ : दीपनगर औष्णिक केंद्रातील 500 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार बॉयरल ट्यूब लिकेजमुळे पुन्हा बंद झाला आहे. गेल्या दोन महिन्यांंपासून दीपनगर औष्णिक केंद्रात सातत्याने बॉयरल ट्यूब लिकेजमुळे संच बंद ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मागणीच्या काळातच पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. यासोबतच दीपनगर केंद्रातील विजेचे मूल्य वाढण्याची भीती आहे.
राज्यातील बहुतांश शहरांच्या तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे.तापमानामुळे राज्याच्या वीज मागणीत सातत्याने वाढ होत आहे. विजेची मागणी 28 हजार मेगावॅटपेक्षा अधिक झाली आहे. त्यातच दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 500 मेगावॅटचा संच क्रमांक चारचे बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद झाला. यामुळे दीपनगर औष्णिक केंद्रातील वीज निर्मितीमध्ये घट झाली झाली आहे. सध्या दीपनगरातून केवळ 50 टक्के पीएलएफ गाठून विजेची निर्मिती केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून संच क्रमांक चार व पाचचे सातत्याने बॉयलर ट्यूब लिकेज होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. संच चारच्या बॉयरल ट्यूब लिकेज दुरुस्तीचे काम अल्पावधीत पूर्ण करून हा संच कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. यानंतर विजेची निर्मिती वाढेल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दीपनगरातील संच क्रमांक चारची वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम गेल्या ऑगस्ट 2023 मध्ये करणे अपेक्षीत होते मात्र ते अद्यापही पूर्ण झाले नाही. यासोबतच संच क्रमांक पाचची वार्षिक देखभाल दुरुस्ती रखडली आहे. यामुळे वारंवार बॉयरल ट्यूब लिकेज होण्याचे प्रमाण वाढले आहे. या महिन्याभरात संच क्रमांक चार तीन वेळा ट्यूबलिकेज झाला असून संच बंद करुन दुरुस्तीवर भर द्यावा लागत आहे.



