भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यंदा या सांस्कृतिक उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. एक दिवसाआड म्हणजेच 25, 27 आणि 29 जुलै असे तीन दिवस ही व्याख्यानमाला होईल.

साहित्यीक जितेंद्र लाड गुंफणार प्रथम पुष्प
यंदा सोमवार, 25 जुलै रोजी अहिल्यादेवी कन्या विद्यालयात नवी मुंबईचे साहित्यिक जितेंद्र लाड हे ‘माझ्या जगण्याचं बळ’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील तर बुधवार, 27 रोजी रामदास गणपत झांबरे विद्यालयात औरंगाबाद आकाशवाणीचे निवेदक ध.सु.जाधव हे ‘चला संवादी होऊ या’ या विषयावर द्वितीय तसेच शुक्रवार, 29 जुलै रोजी प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात नाशिकचे कवी प्रशांत केंदळे हे ‘माझ्या कवितेचे गाणे’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफतील. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमाला समितीची बैठक रविवारी सुरभीनगरातील कार्यालयात घेण्यात आली. त्यात या तीन दिवसीय फिरत्या व्याख्यानमालेची माहिती देण्यात आली. फाउंडेशनचे मार्गदर्शक स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या आठवणींनाही या बैठकीत उजाळा देण्यात आला. समन्वयक गणेश फेगडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे यांच्यासह पदाधिकारी व समन्वय समिती सदस्यांची उपस्थिती होती. कोविळमुळे गेली दोन वर्षे ही व्याख्यानमाला ऑनलाईन झाली होती. यंदा ती शाळा व महाविद्यालयात होणार असल्याने विद्यार्थ्यांनाही उत्सुकता असल्याचे समन्वयक गणेश फेगडे यांनी नमूद केले.
भुसावळचा सांस्कृतिक ठेवा द्वारकाई व्याख्यानमाला
द्वारकाई फिरत्या व्याख्यानमालेचे यंदा आठवे वर्ष आहे. गेल्या आठ वर्षापासून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील दिग्गज वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी भुसावळकरांना मिळते आहे. थेट वक्ता विद्यार्थी दशेतील श्रोत्यांपर्यंत जात असल्याने वेगळे नात निर्माण होतं. पाठ्यक्रमातील लेखक, साहित्यीक, कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला नेण्याचा प्रयत्नही केला जातो आहे, असे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले.


