जळगाव : सततच्या पावसामुळे हतनूर धरणाच्या 41 दरवाज्यांपैकी 36 दरवाचे पूर्णपणे उघडण्यात आले असून नदीपात्रात सद्यस्थितीत 41 हजार 32 क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. सोमवारीसंध्याकाळी 80 हजार क्सुसेस ते 1 लाख 25 हजार क्युसेस पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून होण्याची शक्यता आहे. तापी काठच्या नागरीकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन जळगाव व कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरीकांना सुरक्षित स्थलांतर करण्याचे आवाहन
सखल भागात राहणार्या नागरीकांनी तसेच नदी काठच्या नागरीकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नाले, ओढे काठच्या नागरीकांनी दक्ष रहावे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये, जमिनीखालून जाणार्या विद्युत तारेपासून सावध राहावे, असेही जळगाव जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


