भुसावळ –
तालुक्यातील काहूरखेडा शिवारात कंटेनर अपघातग्रस्त झाल्यानंतर काहूरखेडा शिवारातील नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली असता या कंटेनरमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले. नागरीकांनी या संदर्भातील माहिती वरणगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत कंटेनर ताब्यात घेतला असून गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशकडून मालेगावकडे जाणारा कंटेनर (डी.एन .01 डी.बी.7098) हा काहूरखेडा शिवारानजिक आला असता त्यात बिघाड झाला. स्थानिक नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली असता कंटेनरमध्ये गुरे असल्याचे कळताच वरणगाव पोलिसांना माहिती कळवण्यात आली. यावेळी अत्यंत निर्दयतेने व दाटी-वाटीने गुरांची वाहतूक केली जात असल्याने यात सुमारे पाच गुरांची मृत्यू झाल्याचे समजते तर अन्य 15 गुरांनी जळगावच्या गो शाळेत रवाना करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


