जळगाव –

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरू असून सर्वच शाळेतील १०० टक्के शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत. अनेक प्राध्यापक आणि शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे शहरातून ये-जा करतात. कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करत नसल्याने व महाविद्यालयात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्वच प्राध्यापकांची आणि शिक्षकांची काेविड चाचणी सक्तीची करावी, अशी मागणी जळगांव जिल्हा शिक्षकसेनेचे जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांनी जिल्हाधिकारी अविनाश राऊत यांच्याकडे केली आहे.
कोरोनाला निमंत्रण देण्याचा प्रकार;
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक उच्च व माध्यमिक तसेच औषधशास्त्र, अभियांत्रिकी व शाळांचे शैक्षणिक वर्ष १५ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. कोविड परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय व शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता संबंधित व्यवस्थापन समितीने व व्यवस्थापन यांनी घेऊन पहिली ते अकरावी ५० टक्के, इयत्ता १० वी व १२ वी शिक्षकेतर कर्मचारी, अभियांत्रिकी व औषधशास्त्र १०० टक्के, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची उपस्थिती १०० टक्के पुढील आदेश येईपर्यंत अनिवार्य केली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि शाळा सुरू असून सर्वच शाळेतील १०० टक्के प्राध्यापक आणि शिक्षक उपस्थित आहेत. हा कोरोनाला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे, महाविद्यालयातील किंवा शाळेतील प्राध्यापकांचे किंवा शिक्षकांचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्या संस्थेने ७० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असे प्रा.गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.


