भुसावळ –

गेल्या 14 महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शिवाय कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगारावरही परीणाम झाला असताना दुसरीकडे शाळा बंद असताना व केवळ ऑनलाईन शिक्षण देण्यात आल्यानंतरही खाजगी शाळांनी पूर्णपणे फी वसुल केल्याने पालकांचे कंबरडे मोडले आहे. मुळातच विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत, वर्ग भरले नाहीत तसेच क्रीडांगणाचादेखील वापर झाला नसताना सक्तीने फी वसुली करण्यात आल्याने पालकवर्गात असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर खाजगी शाळांवर कारवाई करावी तसेच पालकांना जमा करण्यात आलेल्या फीतून अर्धी रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी आपले मानवाधिकार फाउंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या मेलद्वारे केली आहे.
हे देखील अवश्य वाचा : नवजात बाळासह पाच वर्ष वयोगटातील बालकांची हृदयावरील शस्त्रक्रिया होणार मोफत
शिक्षण मंत्र्यांनी दखल घेण्याची अपेक्षा
मयूर अंजाळेकर यांनी शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या मेलनुसर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन पद्धत्तीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्या शाळेत गेले नाहीत, मैदानाचा, लायब्ररीचा व शाळेतून मिळणार्या साहित्याचादेखील काडीमात्र वापर झालेला नाही मात्र असे असतानाही खाजगी शाळांनी पालकांना संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावत फी वसुलदेखील केली. अनुदानीत शाळांना शासनाकडून अनुदान मिळत असल्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना फी बाबत जास्त विचारणा होत नाही मात्र विना अनुदानित शाळेतील पालकांकडून मात्र फी उकळण्यात आली. मूळातच लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला व असे असताना पालकांनी उधार-उसनवार करून पाल्यांची जमा केली असून पालकांची परीस्थिती पाहता खाजगी शाळांनी पालकांना अर्धी फी परत करण्यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गांभीर्याने दखल घ्यावी व खाजगी शाळांवर कारवाई करून फी परती संदर्भात आदेश काढावेत, अशी अपेक्षा अंजाळेकर यांनी मेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.


