भुसावळ (प्रतिनिधी )-
फेब्रुवारी-मार्च-एप्रिल २०२१ देयकात श्रीनगर, खळवाडी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर विभागातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्यात महावितरणने अतिरिक्त बिलाचा शॉक दिला आहे. नलिणी अरुण तळेले, धंनजय सोनवणे, चंद्रकांत पाटील, काशिनाथ गुळवे, मधुसूदन ढाके, अशोक सोनवणे, ज्ञानदेव गुळवे, मुरलीधर यशवंत महाजन, अरुण गोविंदा लोखंडे, राधाबाई शंकर सोनवणे, काशीनाथ गुळवे, धनेश पाटील व इतर अनेक ग्राहकांना चुकीचे रिडींग पाठवून अतिरिक्त रक्कम आकारली आहे. नागरिकांनी मार्च महिन्यातच याबाबत कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
एजन्सीने ग्राहकांना वेळेत देयक सादर केले नाही व रिडींगमध्येही वारंवार चुका केल्या आहेत. त्यामुळे कोरोना काळात ग्राहकांना महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्यात. याचा परिणाम महावितरणचे अनेक कर्मचारी व ग्राहक कोरोनाच्या विळाख्यात सापडले, तर काही कोरोनामुळे दगावले, म्हणून या एजन्सीवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
दोन वर्षांपासून अनेक वेळा तक्रारी केल्या. कर्मचारी येतात सुधारित बिल देतात परंतु पुढच्या महिन्यात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. आधी जिनस मीटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चुका केल्या आता रिडींग एजन्सी चुका करतेय. घर बंद असतांना सुद्धा १००० अतिरिक्त रिडींग टाकले जात आहे.

- अरुण तळेले, ग्राहक, श्रीनगर, भुसावळ
ग्राहकाने मोबाईल वरून तक्रार केल्यास ती लवकर दुरुस्त होत नाही, आधी बिल भरा मग तक्रार सोडवू असे सांगितले जाते. चूक एजन्सी करते, महावितरण कर्मचारी आणि ग्राहकांना हेलपाट्या होतात. अचूक बिल दिली पाहिजे, वेळेवर त्यांच्या समस्या सुटल्यास त्यांना कार्यलयात जावे लागणार नाही. परिणामी कोरोना रोखता येईल. मुख्य समस्या वारंवार सांगून सुद्धा महावितरणने लक्ष दिले नाही
-प्रा.धिरज पाटील, शिवसेना तालुका संघटक, भुसावळ


