मुंबई –
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात उद्योगधंदे, व्यापार यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या परीक्षांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं वर्षा गायवाड यांनी सांगितलंय.



