भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय दूरसंचार विभागाकडे अनेक ग्राहकांनी आपले दूरध्वनी संच परत करून अनेक महिन्यांचा कालावधी लोटूनही ग्राहकांनी कनेक्शनसाठी भरलेली अनामत रक्कम ग्राहकांना अद्यापही परत मिळालेली नाही. या प्रकरणी आता बीएसएनएलला ग्राहक न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी एका पत्रकानवये दिला आहे.
मोबाईलचा वापर वाढला
मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक ग्राहकांनी त्यांचे दूरध्वनी संच बीएसएनएलकडे परत केले आहेत. खरे तर त्याच वेळी ग्राहकांना त्यांची अनामत रक्कम परत मिळायला हवी होती परंतु अनेक महिने झाले तरी त्यांना त्यांची अनामत रक्कम परत मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा बीएसएनएल कार्यालयात फेर्या मारल्या परंतु अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. सध्या बीएसएनएची आर्थिक स्थिती बरी नाही. तुमचे पैसे मिळण्यासाठी प्रस्ताव मुंबईला पाठवला आहे. तेथून धनादेश आले म्हणजे तुम्हाला कळवू, असे अधिकारी सांगतात. शेकडो ग्राहकांची हजारो रुपयांची रक्कम बीएसएनएलकडे अडकून आहे. ग्राहकांच्या तक्रारीनुसार जळगाव जिल्हा महाप्रबंधक यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे प्र. ह. दलाल यांनी ग्राहकांना त्यांची अनामत रक्कम मिळावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.



