भुसावळ (प्रतिनिधी ) –
शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रांताधिकार्यांनी दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत मात्र त्यानंतर काही दुकानदार नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे सातत्याने आढळून येत असल्याने पालिकेच्या पथकाकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे शिवाय भाजी बाजार भरवण्याचे दिवस असतानाही शुक्रवार ३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर विक्रेत्यांनी बाजार भरवल्याने पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत दंड वसुल केला.
शहरातील अप्सरा चौक, मुख्य बाजार, मोटू शोभराज चौक, विकास कॉलनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान सह विविध भागात झालेल्या कारवाईत ३५ दुकानदारांकडून विक्रेत्या विरुद्ध कारवाई करून एकूण ३ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून पालिका पथकाने सामान जप्त केले . या कारवाईने विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
शुक्रवारी भाजीपाला व फळविक्री तसेच हातगाड्यांवरुन कापड, कटलरी विक्री करता येणार नसतांना काही विक्रेते बाजारपेठेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पथकाने संबंधिताचे सामान जप्त करीत पालिकेत आणले. दंडाची रक्कम भरणार्या विक्रेत्यांना सामान परत देवून तंबी देण्यात आली. उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरूच होती.
ही कारवाई अभियंता पंकज पन्हाळे, लेखापाल संजय बाणाईते, राजू वाघ, चेतन पाटील, रामदास म्हस्के, सुरज नारखेडे, महेश चौधरी, परवेज शेख, अनिल भाकरे, विजय राजपूत, अनिल मनवाडे, राजेंद्र नाटकर, किरण मनवाडे आदींच्या पथकाने केली.



