भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील काहूरखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला प्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, प्रश्नमंजुषा कार्यक्रम,चित्रकला स्पर्धा आणि भारतीय संविधानाची पुस्तके हातात घेऊन विद्यार्थ्यांची गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.

भारतीय संविधानाविषयी विद्यार्थ्यांना उपशिक्षक समाधान जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानामध्ये हक्क, अधिकार, कर्तव्य यांची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. त्याचप्रमाणे सर्व न्यायालय, सर्व प्रशासकीय कार्यालय, त्यामधील नोकरवर्ग यांनी कसा कार्यभार करावा याविषयी माहिती दिली आहे आणि सर्व गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश पातळीवर राज्य कारभार कसा करावा. याविषयी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. त्याचप्रमाणे संविधानिक मूल्य दिलेली असून त्या संविधानिक मूल्यांचा अंगीकार करून भारताचे सुजाण नागरिक व्हावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
प्रश्नमंजुषा कार्यक्रमांमध्ये समाधान जाधव यांनी संविधान कोणत्या भाषेत लिहिले आहे? संविधान लिखित आहे की अलिखित? संविधान तयार करण्यास किती वेळ लागला? संविधान सभेचे सदस्य कोण होते? मसुदा समितीचे सदस्य अध्यक्ष कोण होते? संविधान कधी स्वीकारले आणि कधी लागू करण्यात आले? संविधानानुसार आपल्याला मिळणारे हक्क आणि अधिकार कोणते? अशा प्रकारचे प्रश्न विचारून प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. आणि विजेत्या विद्यार्थ्यांना स्केच पेन, पेन, पेन्सिल, खोडरबर रंग खडू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानावर आधारित हक्क आणि अधिकार यावर चित्र काढून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले.
सोबतच भारताच्या संविधानाचे पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देऊन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली आणि भारताच्या संविधानाच्या पुस्तकांची पाहणी विद्यार्थ्यांनी केली. त्यातील हक्क आणि अधिकारांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नलिनी पाटील आणि अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले. तर आभार उपशिक्षिका उज्वला सुरवाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



