भुसावळ (प्रतिनिधी ) : कौटूंबिक खटल्याची केस घेवू नये या वादातून भुसावळातील वकिलावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना श्री नगर भागवत मंगळवारी दुपारी घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. रोझोदा, ता.रावेर येथील संशयीताला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
प्रवीण भागवत कोळी (35, श्रनगर, भुसावळ) हे व्यवसायाने वकिल आहेत. मंगळवारी दुपारी त्यांच्याकडे संशयीत विकास धांडे (30, रावेर तालुका) हा तरुण आला व त्याने खावटीची केस घेवू नये म्हणत वाद घातला तसेच कोर्टात पत्नीविषयी दाखल असलेल्या प्रकरणात सेटलमेंट करावी म्हणून गळ घातली व तसे करण्यास वकिलाने नकार दिल्याने संशयीताने आपल्याकडील चाकूने वकिलाच्या बोटावर हल्ला केला. या प्रकारानंतर कोळी यांनी शहर पोलीस ठाणे गाठत कैफियत सांगितल्यानंतर संशयीत विकास धांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



