भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोमवारपासून शहरात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार आहेत. सकाळी सात ते अकरा दरम्यानच अत्यावश्यक सेवा खुली राहणार आहे. त्यात देखील गर्दी करणारे, नियमांचे पालन न करणारे यांच्यावर सोमवारपासून कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
सकाळी 11 आस्थापने सुरू असल्यास सील करणार
लॉकडाउन अंतर्गत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे मात्र 11 वाजेनंतर काही आस्थापने सुरू असतात, तसेच अत्यावश्यक आस्थापनांना व्यतिरिक्त इतरही दुकानदार आपली दुकाने सुरू करत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाणार असून संपूर्ण शहरात गस्त घालून दुपारी 11 नंतर दुकाने सुरू असल्यास हे दुकाने सील केली जाणार आहेत तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांना शासनाने होम डिलिव्हरीची परवानगी दिली आहे, मात्र या ठिकाणी थेट ग्राहक येऊन त्याला माल विक्री केला जात असल्याचे दिसून येत आहे. यापुढे असे दिसून आल्यास ग्राहक आणि हॉटेल चालक या दोघांवर कारवाई केली जाणार आहे तसेच हॉटेल सील केले जाणार असल्याचे डीवायएसपी वाकचौरे यांनी सांगितले.



