भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपापल्या गावी परतण्यासाठी नागरिक रेल्वे स्टेशनवर धाव घेत आहेत. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी रेल्वे विभागाने कोविड-१९ प्रोटॉकॉलची अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वेमध्ये मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे प्रशासनाकडून ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ट्रेनमध्ये किंवा रेल्वेच्या परिसरात विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांना हा दंड केला जाणार आहे. रेल्वे बोर्डाकडून देशभरातील सर्व रेल्वे विभागांना एका परिपत्रकाद्वारे या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वेमंत्र्यांकडे केली होती तक्रार:
रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते होते. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू शकतो. त्यात प्रवासी प्रवासादरम्यान तोंडाला मास्क लावत नव्हते, सोशल डिस्टन्सिंग व महत्त्वाच्या नियमांचे पालन करीत नाही अशी तक्रार रेल्वेमंत्री पियुष गोयल, महाव्यवस्थापक संजीव मित्तल, डीआरएम विवेक गुप्ता व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली होती.
रेल्वे प्रशासनाने उशिरा निर्णय:
देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून कामानिमित्त इतर राज्यांत गेलेल्या नागरिकांची आपल्या गावी परतण्यासाठी झुंबड उडाली होती. यामुळे महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण पडला, औषधांचा आणि हॉस्पिटलमधील बेडचा तुटवडा निर्माण झाला. कोरोना रेल्वेच्या माध्यमातून गावागावात पोहचला आहे, रेल्वे प्रशासनाने उशिरा निर्णय घेतला असे प्रा.धिरज पाटील म्हणाले.



