जळगाव (प्रतिनिधी) - खान्देशातील साहित्याचा परीघ आता विस्तारला आहे. केशवसुत काव्यपुरस्कार ,साहित्य अकादमी,ज्ञानपीठ पुरस्काराने तो सन्मानीतही झालाय. सकस साहित्य निर्मितीचे अनेक प्रवाह या भूमीत खळखळत वाहताहेत. या प्रवाहाता आता ललित लेखनाचा साहित्य प्रवाहही सामील झालाय. समर्थ ललित लेखक श्री. चंद्रकांत चव्हाण यांचे ललित लेखन मराठी साहित्याला नवे वळण देणारे आहे."आठवणींच्या हिंदोळ्यावर " या बहुचर्चित ललित लेखनाच्या पुस्तकानंतर त्यांचे प्राईम पब्लिशिंग हाऊस, जळगावने नवे ललितलेखनपर पुस्तक "अधलीमधली पाने" नुकतेच प्रकाशित केले आहे. या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन कवी शशिकांत हिंगोणेकर यांचे हस्ते आणि प्रदीप पाटील प्राईम पब्लिशिंग हाऊस यांचे अध्यक्षते खाली प्राईम सभागृहात संपन्न झाले. या ललित लेखन संग्रहात सभोवतालातील चिंतनशील अशा आशयांकित घटनांचे अनुभूतीकरण उत्तमपणे चंद्रकांत चव्हाण यांनी रेखाटले आहे. मराठी ललित लेखनात हे हृदयस्पर्शी असे सहज चिंतन आहे. "आनंदाची नक्षत्रे" ते "आतले बाहेरचे" जीवनायन त्यांनी या लेखसंग्रहात आंतरिक उर्मीसह प्रतिबिंबित केलेले आहे. संत तुकाराम यांचा.. जोडिली अक्षरे। नव्हती बुद्धीची उत्तरे॥ नाही केली आटी। काही मानदंभासाठी॥ या अभंगाचे सारगर्भ या ललित लेखनात प्रगटले आहे.याचीही प्रचिती या ललित लेखसंग्रहातून येते. असे प्रतिपादन या ललित लेख प्रकाशन निमित्ताने शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. प्राईम चे सहकारी आणि कही रसिकांच्या उपस्थितीत लक्षवेधी हा सोहळा संपन्न झाला.


