खळबळजनक! जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त

जळगाव : जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कृषी विभागाने ‘एमआरसॅक’च्या मदतीने सॅटेलाईटद्वारे केलेल्या पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २७ हजार शेतकऱ्यांनी केळी लागवड नसतानाही विमा काढल्याचे आढळून आले आहे. तसेच जवळपास २९ हजार शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतजमिनीवर केळी लागवड दाखवून विमा काढल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या दोन्ही प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणावर बोगस विमा प्रकरण समोर आले आहे.

या घोटाळ्यात अर्ज भरताना जमा करण्यात आलेली सुमारे ३७ कोटी रुपयांची विमा रक्कम राज्य शासनाने जप्त केली आहे. तसेच ज्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रांवरून हे बोगस फॉर्म भरले गेले, अशा ४८ केंद्र चालकांवरही चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून नोटिसांना मिळालेल्या उत्तरांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.