मुंबई – महापालिका निवडणुकीनंतर शिंदे गट भाजपात विलीन होणार असल्याचा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, 25 रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे..

मालकाशी चर्चा करण्यासाठी दिल्लीवारी !
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंना त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते. जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनावर त्यांना यावं लागायचं. शिवसेना त्यांना कळत नाही. त्यांनी चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व हे राज्यांमध्येच असतात. प्रादेशिक पक्षांची मुख्य कार्यालये राज्यातच असतात. ती दिल्लीत नसतात. चंद्राबाबू नायडू त्यांच्या पक्षािी काम घेऊन दिल्लीत जात नाहीत. आता यांचे मालक दिल्लीत असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागते.
जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा त्यांचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीत जातात. कधी अमित शाहांना भेटतात तर कधी मोदींना भेटतात. बाकी त्याच्यामध्ये काहीही नाही. पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर सुनावणीची तारीख जवळ आली की, त्यांच्या भेटीगाठी वाढतात. ते रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.
तर न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल !
मोदी यांनी शाह यांना माहित आहे की, शिंदेंची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे. त्यांनी त्यांना आमच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरुद्ध वापरून घेतले आहे. आम्ही शाह आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की, महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. तर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टात आपला बचाव करू शकत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. तसा प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले.


