जळगाव (प्रतिनिधी) : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त ‘सातपुड्याचा वाघ वाचवा, जंगल वाचवा’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी VJSS वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित १६ वी राज्यस्तरीय व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली मंगळवारी, २८ जुलै २०२६ रोजी जळगाव येथून चारठाणाकडे रवाना झाली. जळगाव व यावल वनविभागाच्या सहकार्याने आयोजित या रॅलीचे यंदाचे १६ वे वर्ष असून, व्याघ्र संवर्धनासह जंगल व वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. काव्य रत्नावली चौक येथे सकाळी १० वाजता रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक राम धोत्रे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक महेश झांजुर्णे, यावलचे उपवनसंरक्षक संजय सहाय, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी.प्रा वसंत सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्याघ्र संवर्धन, वनरक्षण आणि जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित केले. वाघ हा जंगलाच्या आरोग्याचा महत्त्वपूर्ण घटक असून, वाघांचे संरक्षण म्हणजे जंगल, पर्यावरण आणि भावी पिढीचे संरक्षण असल्याचा संदेश देण्यात आला. रॅली काव्य रत्नावली चौकातून आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेडियम कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुली आणि नशिराबाद मार्गे भुसावळकडे रवाना झाली. भुसावळ येथे दुपारी १.३० वाजता बियाणी मिलिटरी स्कूल येथे व्याघ्र व वन्यजीव संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर रॅली वरणगाव येथील साई मंदिर येथे दुपारी २ वाजता पोहोचेल. येथे सहभागींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढे रॅली मुक्ताईनगर, डोलारखेडा मार्गे चारठाणा येथे पोहोचणार आहे. चारठाणा येथे जनजागृती कार्यक्रम रॅलीच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसरातून व्याघ्र व वन्यजीव संवर्धन जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वढोदा रेंजचे वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे राहणार आहेत. टायगर कन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे प्रसाद हिरे यांच्यासह विनोदजी सोनवणे, वृक्षमित्र संजयजी खैरनार आणि मानद वन्यजीव रक्षक आकाश आहाले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात व्याघ्र व वन्यजीव संवर्धनासंदर्भातील माहितीपत्रकांचे वितरण करण्यात येणार असून, नागरिकांमध्ये जंगल, वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. या रॅलीस योगराज कन्स्ट्रक्शन, मुक्ताईनगर, बजाज ऑटो, सुप्रीम इंडस्ट्रिज, गाडेगाव व जळगाव जनता सहकारी बँक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. VJSS वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था, जळगाव, नाशिक व नंदुरबार तसेच जळगाव व यावल वनविभाग यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “आपली उपस्थिती हीच व्याघ्र संवर्धनासाठी मोठी प्रेरणा!” असा संदेश देत आयोजकांनी जास्तीत जास्त नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, वन्यजीवप्रेमी आणि स्वयंसेवकांनी या जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यशस्वीतेसाठी अजीम काझी.प्रदीप शेळके, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, अरुण सपकाळे, वासुदेव वाढे, निलेश ढाके हेमराज सपकाळे, अशोक खामकर, गणेश सपकाळे, रवींद्र भोई, बबलू शिंदे, शाम पाटील स्कायलेब डिसुजा, सुरेंद्र नारखेडे प्रसाद सोनवणे विनोद खोडपे रामलाल बोरसे संतोष चौधरी राजू गुप्ता विकास गायकवाड भरत शिरसाठ प्रभाकर निकुंभ प्रथमेश सैंदाणे लोटन भामरे समाधान गोसावी गणेश सुरसे प्रवीण चौधरी मयूर वाघूळदे, ऋषी राजपूत, दीपक महाजन, परिश्रम घेत आहे.


