मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले ; मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मात्र इतरत्र स्वतंत्र लढणार –

मुंबई : आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती होणार असल्याचे सांगत अन्य ठिकाणी महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे लढतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मतदार याद्यांमध्ये विरोधकांच्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या घोळाचे पुरावे आम्ही जमा केले असून ते पुरावे आम्ही देऊ, अशा इशाराही यावेळी यावेळी दिला.
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांवर हरकती सूचना मागवल्या होत्या तेव्हा यांनी एकही हरकत का घेतली नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला आहे. वर्षा निवासस्थानी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात स्वबळावर लढणार?
मुंबई महापालिका वगळता इतरत्र स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार आहोत, असे सांगत अनेक ठिकाणी वेगळे लढण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. आम्ही महायुती म्हणून लढलो तर विरोधकांच्या काही जागा वाढू शकतात त्यामुळे उगाच भावनिक न होता स्वतंत्र लढू, विजय मिळाल्यानंतर महायुती म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असेही ते म्हणाले. ठाणे महापालिकेसंदर्भात आमचा अभ्यास सुरू आहे. तो झाल्यानंतर तिथे महायुती म्हणून लढायचे किंवा स्वतंत्र याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुका पुढे ढकलण्याकरिता कोणतेही ठोस कारण विरोधकांकडे नाही. हे जे चालले आहे ते फक्त गैरसमज परसरवण्याकरिता. लवकरच आमचाही पक्ष याद्यांमधल्या घोळाच्या त्यांच्या काही गोष्टी दाखवेल. त्यांनी काय काय केलंय यांद्यांमध्ये त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात हेही आमच्याकडे आहे.

याद्या सुधारल्या पाहिजेत. त्याच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. पण बिहारमध्ये त्याला विरोध करणारे विरोधक महाराष्ट्रात मात्र याद्या सुधारण्याची मागणी करतात, हा विरोधाभास असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांना पराभव दिसत आहे
चार-पाच ठिकाणी मतदारांची नावे असणे यापेक्षा त्यांनी एकाहून अधिक ठिकाणी मतदान केले असेल तर ते गंभीर आहे. विरोधकांच्या मतदारसंघांत एकाच व्यक्तीची चार ठिकाणी नावे आहेत, पण फोटो वेगळे आहेत. याबाबत आम्ही पुरावे गोळा केले आहेत. मतदारयाद्या अचूकच पाहिजेत. दुबार नावे सगळीकडेच आहेत. 25 वर्षांपासून अशा पद्धतीनेच याद्या आहेत. मी स्वतः 2012 साली या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तो खटला अद्यापही सुरू आहे, मतदारयाद्यांचे कारण पुढे करून विरोधक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करताहेत कारण त्यांना पराभव समोर स्पष्ट दिसत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.