11 वर्षांच्या संसारानंतर दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय ; सुपरफास्ट एक्सप्रेसखाली केली आत्महत्या ;

नाशिक – 11 वर्ष संसार केल्यानंतर दाम्पत्याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. नाशिकमधील घोटी शहरालगत असलेल्या रेल्वे लाईनवर बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत माहिती मिळू शकली नाही. दिनेश देविदास सावंत (38) व भाग्यश्री सावंत (33, रा सुधानगर, घोटी) अशी मृतांची नावे आहेत.

दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल
बुधवारी प्रचीतराय बाबा मंदिर ते घोटी रेल्वे गेट दरम्यान या दाम्पत्याने इगतपुरीच्या दिशेने जाणार्‍या सुपरफास्ट एक्सप्रेसखाली आत्महत्या केली.

घोटी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास निरीक्षक विजय शिंद, सहा. उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, हवालदार मारोती बोर्‍हाडे करीत आहेत. दिनेश हेही इगतपुरी महिंद्रा कंपनीत नोकरीस होते.

दिनेश सावंत व भाग्यश्री सावंत यांचा विवाह सन 2013मध्ये झाला होता. लग्नाला 11 वर्षे होऊनही त्यांना मूलबाळ नव्हते. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.