भुसावळ – भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या आवारात तब्बल 24 दुचाकी वाहने अनेक वर्षांपासून बेवारस पडून आहेत. संबंधित वाहनांचे मालक आजपर्यंत शोधूनही सापडलेले नाहीत, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे यांनी दिली.

दोन महिन्यात संबंधित मालक येऊन त्यांचे वाहन घेऊन गेले नाही तर त्यांच्या गाड्यांचा लिलाव करून ती रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. या वाहनांबाबत अनेक प्रयत्न करूनही कोणीही मालकी हक्कासाठी पुढे आलेले नाही. परिणामी, या वाहनांना गंज लागून ती खराब होत चालली आहेत त्यामुळे या वाहनांचा जाहीर लिलाव करून निर्गती करणे आवश्यक असल्याचे पोलीस ठाण्याकडून सूचित करण्यात आले आहे.
या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 85 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून 8 एप्रिल 2025 रोजी बेवारस वाहनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यानुसार, संबंधित वाहनांचे मालक, हितसंबंधित, वारसदार किंवा विमाधारक यांनी दोन महिन्याच्या आत पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गाडीचे कागदपत्रासह आपला मालकी हक्क सिद्ध करावा अन्यथा कलम 87 अन्वये या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. यानंतर कोणताही दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशी स्पष्ट माहिती पोलीस विभागाने दिली आहे.


