भुसावळ : वरणगाव पाणीपुरवठा योजनेसाठी कठोरा जॅकवेलवरून येणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पूर्वी ज्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकराने टाकली त्याच पद्धतीने समोरून नवीन योजनेची पाईप-लाईन नगरपरिषदेने टाकली आहे. सध्या टाकलेली पाईप लाईन दबावापोटी काढण्याचे फर्मान नहीं चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी नगरपरिषदेस नोटीशीतून काढले आहे मात्र तसे झाल्यास शुक्रवार, 11 रोजी रास्ता रोको करण्यात येईल व होणार्या परिणाम संबंधित विभाग जवाबदार असेल, असे असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे.

कठोरा नदीपात्रात आंदोलन
वरणगावकरांना आधीच 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. माजी नगरध्यक्ष सुनील काळेसह सर्व वरणगावकरांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी नवीन पाईप लाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी टाकीवर चढून कठोरा नदीपात्रात उतरून नगरपरिषदमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी काम युद्ध पातळीवर करून 10 एप्रिलच्या आत पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले. पाणी 10 एप्रिलला न आल्यास 12 एप्रिलपासून जनआंदोलन अधिक त्रीव करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाईप लाईन काढल्यास तीव्र आंदोलन
दबावापोटी टाकलेली नवीन पाईप-लाईन काढण्यासाठी नहिंचे अधिकारी अंजनसोंडा महामार्गाच्या पुलाखाली आले असता माजी नगराध्यक्ष सुनील काळे, नाना चौधरी, मिलिंद भैसे, कृष्णा महाजन, विजय वाघ, मुस्लिम अन्सारी, योगेश माळी, मयूर शेळके यांच्यासह शेकडो वरणगावकरांनी अधिकार्यांना घेराव टाकला. तुम्ही टाकलेली पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन काढण्याचा प्रयत्न केल्यास वरणगाव शहरातून गेलेल्या महामार्गावरून एक सुद्धा वाहन जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका वरणगावकरांनी घेतल्याने पाईप लाईन काढण्यास आलेल्या अधिकार्यांना माघारी परतावे लागले. नहींच्या अधिकार्यांची दबंगगिरीची तक्रार केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. नहींने दबंगगिरी न थांबविल्यास 11 रोजी महामार्ग रोको करण्यात येणार आहे.


